Thursday, May 29, 2008

विज्ञाननिष्ठ निबंध

विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिवाद हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना अन्य अनेक दिग्गजांपेक्षा खूप मोठा बनवते. त्याच्या तर्कशुद्ध बुद्धिवादाची एक झलक आपल्याला या विज्ञाननिष्ठ निबंधातून पाहता येईल. हा लेख सावरकर डॉट ऑर्ग या वेबसाइटवरून साभार...
................
वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर दोन भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी ह्या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे चार बाजू चट्‌कन वेगळ्या झाल्याशा भासतात.

ह्या पदार्थजगतातही मनुष्याच्या जाणिवेची चांदणी चमकू लागताच त्याचे अकस्मात्‌दोन भाग पडतात. उभे विश्व, अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चरकन्‌कापले जाऊन दुभंग होऊन पडते. सुरूप आणि कूरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदूल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी, ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा ह्या यच्चयावत् ‌विश्वाचा, वस्तुजागताचा, केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबिंदू समजला जाताच अकस्मात्‌उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुष्यास जो दु:खद तो दुसरा पहिला चांगला, दुसरा वाईट. ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव; मनुष्यास दु:ख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस.

मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता, बरेवाईटपणा, मोजला असता ह्या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असे काही म्हणता येणार नाही.
विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूपगंधस्पर्शादि सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकतात. विश्वातील वस्तूजात एकेकी गणून, तिचे पृथक्करण करून, ते घटक पुन्हा मोजून त्या अमर्याद व्यापाची जंत्री करीत राहिल्याने विश्वाच्या असीम महाकोषातील वस्तुजाताचे मोजमाप करणे केवळ अशक्य असे समजून आपल्या प्राचीन तत्त्वज्ञान्यांनी, आपल्या पाच ज्ञानेंद्रियानीच ज्या अर्थी हे सर्व विश्व केव्हाही जे काही आकळले जाऊ शकणारे आहे ते जाऊ शकते, त्या अर्थी त्याचे "पंचीकरण' करणे हाच वर्गीकरणाचा उत्कृष्ट मार्ग होय असे जे ठरविले ते एका अर्थी क्रमप्राप्तच होते. इतकेच नव्हे, तर तो त्यांच्या अप्रतिम विजयच होता.

ज्ञानेंद्रियेच जर पाच तर विश्वाचे यच्चायावत्‌वस्तुजात त्यांच्या त्या पाच गुणांपैकी कोणत्यातरी एका वा अनेक गुणांचेच असणार. अर्थात्‌त्या पाच गुणांच्या तत्त्वांनी, पंचमहाभूतांनीच, ते घडलेले असणार. ह्या विश्वदेवाचा आम्हाशी जो काही संवाद होणे शक्य आहे तो ह्या त्याच्या पाचमुखांनीच काय तो होणार म्हणूनच तो विश्वदेव, तो महादेव पंचमुखी होय! आपल्या ज्ञानेंद्रियांनी विश्वाच्या गुणधर्मांचे आकलन करण्याचा मनुष्याचा हा यत्न जितका अपरिहार्य नि सहज, तितकाच स्वत:च्या अंत:करणाने त्या विश्वाला निमिणार्‍या देवाच्या अंत:करणाची कल्पना करण्याचा मनुष्याचा यत्नही साहजिकच होता. त्यातही मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टि निर्मिली असली पाहिजे, ह्या मानवी निष्ठेला अत्यंत प्रबळ असा पाठिंबा ही सृष्टिदेवीच प्रतिपदी, प्रतिपली तिला तशी लहरच आली की सारखी देत राही, आजही देतेच आहे!

खरोखर, मनुष्याच्या सुखसोयीसाठी त्या दयाळू देवाने ही सृष्टीची रचना किती ममताळूपणाने केली आहे पहा! हा सूर्य, हा समुद्र - किती प्रचंड ही महाभूते ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील त्या देवाने लावले. दुपारी तहान तहान करीत मुले खेळत दमून येतील तेव्हा थंडगार नि गोड पाणी मिळावे म्हणून आई सकाळीच विहिरीचे पाणी भरून "कुज्या'त घालून गारत ठेवते, तशा ममतेने उन्हाळ्याने नद्या सुकून जाण्याच्या आधीच हा सूर्य त्या समुद्रातले पाणी किरणांचे दोर खोलखोल सोडून भरतो, मेघांच्या "कुज्या'तून साठवून ठेवतो, आणि तेही मध्यंतरी अशी काही हातचलाखी करून, की असमुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट असणारे ते पाणी किरणांच्या कालव्यातून त्या आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात साचताच इतके गोड नि गार व्हावे की जे पाणी पिण्यासाठी देवांच्याही तोंडास पाणी सुटावे ! पुन्हा समुद्राचे खारट पाणी माणसासाठी गोड करून देण्याच्या धांदलीच साराचा सारा समुद्र गोड करण्याची भलतीच चुकीही न होईल अशी तो दयाळू देव सावधगिरीही घेववितो - एका वर्षात हवे तितकेच पाणी गोड करून आटविण्याइतकीच शक्ति सूर्यकिरणात आणि साठविण्याइतकीच शक्ति मेघात ठेविली जाते. नाहीतर सारा समुद्रात गोड झाल्याने मनुष्यास मीठ मिळणे बंद होऊन त्याचा सारा संसार अळणी व्हावयाचा !

तशीच ही मनुष्याच्या देहाची रचना! पायाच्या तळव्यापासून तो मज्जातील सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत ह्या शरीराची रचना मनुष्याला सुखदायी होईल अशीच सुसंवादी करताना हे मनुष्यच्या देवा, तू जी केसानुकेसागणीक काळजी घेत आला आहेस ती कुठवर सांगावी ! मनुष्याचा हा एक डोळा जरी घेतला तरी, किती युगे, किती प्रयोग, किती अनवरत अवधाने करून तू हा आज आहे तसा घडवू शकलास! प्रथम प्रकाशाला किंचित्‌संवादी असा एक नुसता त्वग्बिंदु; प्रकाशाला नव्हे तर त्याच्या सावलीला तेवढा जाणणारा; अंधेर नि उजेड इतकाच फरक काय तो जाणणारा तो पहिला त्वग्बिंदु; त्याच्यात सुधारणा करता करता किती प्रयोग करून, किती रद्द करून, पुन्हा प्रयोग रचता रचता शेवटी आज मनुष्याचा सुंदर, टपोरा, पाणीदार, महत्त्वाकांक्षी डोळा तू घडविलास! इतका महत्त्वाकांक्षी डोळसपणा त्या मनुष्याच्या डोळ्यात मुसमुसत आहे की, देवा, तुझ्याच कलेत तुझाच पाडाव करण्यासाठी दुर्बिणीचे प्रतिनेत्र निर्मून तो तुझ्या त्या आकाशातील प्रयोगशाळेचेच अंतरंग पाहू इच्छीत आहे! नव्हे तुलाही त्या दुर्बिणीच्या टप्यात गाठून कुठेतरी प्रत्यक्ष पाहता येते की नाही याचे प्रयोग करू म्हणत आहे!!!

आणि त्या मनुष्याच्या डोळ्यास प्रसादविण्यास्तव सौंदर्याचा नि सुरंगाचा जो महोत्सव तू त्रिभुवनात चालू केलास त्याची आरास तरी काय वर्णावी? आम्हाला, जशी आमच्या लेकरांची माया आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या सुखासाठी जपतो तसेच आमच्या सुखासाठी इतके जपणार्‍या देवा, तुला आम्हा मनुष्यांची माया असलीच पाहिज. आम्ही माणसे, देवा, तुझी लेकरे आहोत. तू आमची खरी आई आहेत! आईला देखील दूध येते-तू दिलेस म्हणून! आम्ही मनुष्ये मुझे भक्त आहोत, आणि देवा, तू आम्हा मनुष्यांचा देव आहेस.
इतकेच नव्हे, तर तू आम्हा मनुष्यांचाच देव असून तूझ्यावाचून दुसरा देव नाही! हे सारे जगत्‌तू आमच्या सुखसोयीसाठीच घडविले आहेस!

मनुष्याच्या इच्छेस जुळेशी ही विचारसरणी, सत्यास जुळेल अशीही ठरली असती-जर या जगातील प्रत्येक वस्तु नि प्रत्येक वस्तुस्थिति मनुष्याला सुखकारक नि उपकारक अशीच असती तर! पण मनुष्याच्या दुर्दैवाने या सार्‍या जगातील तर राहोतच, पण ज्या पृथ्वी तो मनुष्य प्रथम प्रथम तरी "सारे जग' म्हणून स्वाभाविकपणेच संबोधित होता, जिला विश्वंभरा, भूतधात्री, अशा नावाने तो अजूनही गौरवितो, त्या पृथ्वीवरील वस्तुजातही वा वस्तुस्थितिही मनुष्यास सर्वस्वी अनुकूल नाही; इतकेच नव्हे, तर उलट अनेक प्रकरणी मारकच आहे.

ज्या सूर्याचे नि समुद्राचे मनुष्यावर झालेले उपकार आठवून आठवून आताच त्यांची स्तोत्रे गाइली तो सूर्य नि तो समुद्रच पहा! कुराणात, तौलिदांत, भाविक पैगंबरांनी स्तुति केली आहे की "मनुष्यासठी, हे देवा, हे किती असंख्य मासे, किती रुचकर अन्नाचा हा केवढा अखंड साठा तू या समुद्रात ठेवला आहेस!' पण तोच समुद्र मनुष्यास जशाचा तसाच गिळून पचवून टाकणार्‍या अजस्त्र सुसरींना आणि प्रचंड हिंस्त्र माशांनाही तसेच नि:पक्षपाताने पाळीत आहे! आशिया आणि आफ्रिका यांस जोडणारे खंडच्या खंड ज्या दिवशी महासागरात, त्या खंडावरील वर माला घेऊन उभ्या असलेल्या लक्षावधि कुमारिकांसह, दूधपाजत्या आयालेकरांसह, अर्धभुक्त प्रणयी जनांसह, पुजांजलि वाहत्या भक्तांसह, त्याच देवाची स्तुती चाललेल्या लाखो देवालयांसह ते खंडच्या खंड त्याच देवाने ज्या दिवशी त्या महासागरात गणपति हबकन्‌बुडवावा तसे बुडविल, त्याच्या दुसर्‍या दिवशी हीच उषा, हीच वेदांनी गाइलेली उषा, असेच गोड गुलाबी हास्य हसत त्या शुकशुकाट दृश्याकडे पहात होती!

जर ह्या विश्वातील यच्चयावत्‌वस्तुजातीच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे असे मानल्यावाचून वरील विसंगतीचा उलगडा होऊच शकत नाही.

तरीदेखील ज्या कोणच्या हेतूने वा हेतूवाचून ही विश्वाची प्रचंड जगड्‌व्याळ उलाढाल चालू आहे तीत एक अत्यंत तात्पुरता नि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला, त्याच्या लांबीरुंदीच्या गजाने मापता यावे असे, त्याच्या संख्येत मोजता यावे असे, इतके सुख नि इतक्या सोयी अपभोगिता येतात हा मात्र आणि एढाच काय तो ह्या विश्वाच्या देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय! मनुष्याला ह्या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर ह्या विश्वाची रचना ह्या विश्वाच्या देवाने केली असती, तर त्याचा हात कोण धरणार होता! हे सुगंध, हे सुस्वर, हे सुखस्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, ह्या रुचि, ह्या सोयी आहेत, त्याही अमूप आहेत! ज्या योगायोगाने मनुष्यास ह्या सर्व लाभत आहेत त्या योगायोगाला शतश: धन्यवाद असोत! ज्या विश्वशक्तींनी कळत न कळत असा योगायोग जुळवून आणला त्यांना त्या अंशापुरते मनुष्याचा देव म्हणून संबोधिल्याचे समाधान आपल्यास उपभोगिता येईल, उपकृत भक्तीचे फूल वाहून त्यास पूजिताही येईल!

परंतु त्या पलीकडे ह्या विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पहावा तसा कोणचाही बादरायण संबंध जोडण्याची लचाळ हाव मनुष्याने आमूलात्‌सोडून द्यावी हेच इष्ट! कारण तेच सत्य आहे! आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी ह्या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत.

ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मुनष्याच्या हातात आहे. मुनष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी निती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पेक्षा विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे-असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!!

(संपादित)

No comments: